Sunday, October 9, 2022

वाचन प्रेरणा दिन Importance of Reading

 









वाचन प्रेरणा दिवस मानवी जीवनात वाचनाचे महत्व

ग्रंथ आमुचे साथी ,

ग्रंथ आमुच्या हाती ,

ग्रंथ उजळती

अज्ञानाच्या ...अंधाराच्या राती  l

या ग्रंथांच्या तेजामधुनी

 जन्मा येते क्रांती ,

ग्रंथ शिकविती माणुसकी

अन  ग्रंथ शिकविती शांती 

निराश जीवा धीर धरुनी

 पुढे घेऊनी जाती  .

ग्रंथ आमुचे साथी ,ग्रंथ आमुच्या हाती ,

ग्रंथ उजळती

अज्ञानाच्या ...अंधाराच्या राती .

                   वाचन हे एक ज्ञानार्जनाचे साधन आहे .वाचन संस्कार आणि संस्कृतीसंवर्धनाचा महत्वपूर्ण उपाय आहे .वाचन हा मने घडविणारा सुसंस्कार आहे .निर्मळ आनंद देणारा आनंदयोग आहे .वाचन ही जीवनभर पुरणारी शिदोरी आहे    .

                  माहिती तंत्रज्ञानाच्या युगात बालकांपासून ते आजोबांपर्यंत सगळीच माणसे दूरदर्शन ,मोबाईल भोवती केंद्रित झालेली दिसतात .तास न तास टी .व्ही .समोर बसणारी माणसं , स्वतःसाठी दररोज चार ओळी वाचायलाही तयार नाहीत .परिणामी संस्कृती अधःपतनास सुरुवात झाली . आणि मग पुन्हा सांगण्याची वेळ आली, “वाचाल तर वाचाल!


                                  मित्रहो वाचन हा फक्त विरंगुळा नाही तर अर्थपूर्ण विरंगुळा आहे . कारण मनोरंजनाबरोबरच ज्ञानार्जनाचा प्रमुख हेतू वाचनामागे असतो . आपण खरं तर वेळ जात नाही म्हणून वाचन करण्यापेक्षा वाचनासाठी वेळ काढला पाहिजे .वाचन लहानपणी ज्ञान देण्याचं काम करतं .तारुण्यात शील रक्षणासाठी विवेक आणि सद्भावना निर्माण करण्याचं काम करतं आणि वार्धक्याच्या काळात दुखः हरण करून आनंद देण्याचं काम करतं .

                  बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत म्हणजेच संपूर्ण जीवनात मानवाला साथ देण्याचे आणि संकटातून वाचवण्याचे काम वाचन करते .ज्येष्ठ साहित्यिक वि .स .खांडेकर म्हणतात ,वाचनाने माझ्या जीवनातील आनंदाच्या क्षणांमध्ये अधिकच सुगंध भरला आणि दुःखाच्या वेळी संकटाशी लढण्याचे सामर्थ्य वाचनानेच दिले .वाचानासाठी आपल्याकडे भरपूर साहित्य उपलब्ध आहे .कथा , कादंबरी ,ललितगद्य ,काव्य ,महाकाव्य ,ग्रंथ इ .

वाङ्मयचा डोंगरच आपणासमोर उभा आहे .कमी आहे ती फक्त वाचणाऱ्यांचीच आणि म्हणूनच वाचन संस्कृती मरते आहे .असे म्हणण्याची वेळ आली आहे .अगदी विद्यार्थीदेखील पाठ्यपुस्तके संदर्भ पुस्तके वाचण्यास तयार नाहीत .

अभ्यासाला वेळ नाही ,

शॉर्टकटचा काळ आहे  l

पुस्तके बाजारात मिळत नाहीत ,

गाईड्सचा सुकाळ आहे 

प्रार्थना ,पसायदान पाठ नाही ,

आणि सिनेमाची गाणी

मात्र सारी तोंडपाठ आहेत l 

                           एक प्रख्यात तत्वज्ञ अनंत देसाई वृद्धापकाळात पुस्तक उचलत नाही म्हणून पुस्तकाची पाने फाडून ती हातात धरून वाचत असत .तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी वयाच्या ९० व्या वर्षीही वाचन केल्याशिवाय झोपत नसत .अशा प्रकारे वाचनाच्या तपश्चर्येमुळे ही माणसं विद्वान आणि अजरामर झाली . 

                                  आज जे साक्षर आहेत ,ज्यांना चांगले वाचता येते असे लोक वाचनाकडे दुर्लक्ष करत आहेत .आणि ज्यांना वाचता येत नाही त्यांच्या मनात निरक्षर असल्याची उणीव भासत आहे .म्हणूनच वाचन संस्कृती जपायची असेल तर ,वाचकांचा वर्ग वाढला पाहिजे .तसेच संपूर्ण साक्षरता निर्माण करणे ही काळाची गरज निर्माण झाली आहे. सध्याच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटसारख्या आधुनिक साधनावर प्रचंड ज्ञान उपलब्ध आहे .याचा उपयोग वाचकांनी केला पाहिजे . आज प्रत्येक घरात देवघर आहे तसेच ग्रंथघर ही असायलाच पाहिजे .प्रत्येक गावात मोबाईल टॉवर नसला तरी चालेल पण प्रत्येक गावात एक ग्रंथालय आणि प्रत्येक हातात मोबाईल ऐवजी एक पुस्तक असलेच पाहिजे .कारण मोबाईल आणि टॉवरमुळे अप्रत्यक्ष संपर्क साधता येईल .पण संस्कृती विसरून दूर गेलेल्या मनांना एकत्र आणण्याचे काम ग्रंथालय ,त्यातील पुस्तके आणि त्यामार्फत होणाऱ्या संस्कारामार्फतच शक्य होईल .

शेवटी एवढेच म्हणेन ,

A room without books is a body without soul.

जय हिन्द ! 

Related Posts  - 

वाचन प्रेरणा दिवस मराठी भाषण 




तरुणाईचे प्रेरणास्थान ए.पी.जे.अब्दुल कलाम A.P.J.Abdul Kalam Speech





तरुणाईचे प्रेरणास्थान ए.पी.जे.अब्दुल कलाम  A.P.J.Abdul Kalam Speech 

                                                          'माझ्या स्वप्नातील भारत' या पुस्तकाचे लिखाण करून २०२० साली 'माझ्या कल्पनेतील भारत कसा असेल ? अशी संकल्पना सर्वसामान्य जनतेसमोर मांडणारे , 'या देशातील तरुणाईच्या उर्जेतून देशाचा विकास होऊ शकतो'ही संकल्पना ज्या महान व्यक्तीने आपल्यासमोर मांडली ,त्या व्यक्तीचे नाव आहे 'ए.पी.जे.अब्दुल कलाम'.

         कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूमध्ये झाला.त्यांचे पूर्ण नाव 'अबुल पाकिर जैनुल्लब्दिन अब्दुल कलाम असे होय.रामेश्वरजवळ एका खेडेगावात त्यांचा जन्म झाला.वडिलांचा होडीचा व्यवसाय.आपला मुलगा शिकून मोठा व्हावा , ही प्रबळ इच्छा त्यांच्या वडिलांची होती.लहानपणापासून कलाम अभ्यासामध्ये प्रचंड हुशार होते.गणित आणि विज्ञानाची त्यांना प्रचंड आवड होती.याच दोन विषयांच्या प्रेमाने त्यांना त्यांचे नाव जागतिक किर्तीपर्यंत पोहचवता आले.

                               प्राथमिक शिक्षण रामनाथपुरम मद्रास इन्स्टिट्यूट  सेन्ट  जोसेफ कॉलेज तिरुचिरापल्ली  येथे झाले. 1958  ते 1961 या कालखंडामध्ये राष्ट्रीय संरक्षण संस्था या ठिकाणी काम केले. शालेय जीवनामध्ये वर्तमानपत्रे विकली.आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी 'कमवा आणि शिका' या मार्गाचा स्वीकार केला. विक्रम साराभाई यांचे ते शिष्य होते.अमेरिकेमध्ये नासा या संशोधन संस्थेमध्ये 4 महिने प्रशिक्षण घेतले.

            आपल्या देशाचा विकास करायचा असेल आणि शस्त्रास्त्रांच्या दृष्टीने सक्षम बनायचे असेल तर त्यासाठी स्वदेशी बनावटीची क्षेपणास्त्रे तयार केली पाहिजेत ,ही भूमिका कलाम सरांची होती.त्याच दृष्टीने त्यांनी संशोधनास सुरुवात केली.त्यांच्या प्रयत्नांना यश  आले.स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र तयार केले.

              कलाम सरांचे विज्ञान क्षेत्रातले ज्ञान पाहून ,संशोधनातील दृष्टी पाहून त्यांच्यामध्ये असणारा उत्तम संशोधक ,प्रखर राष्ट्रभक्ती असणारा माणूस पाहून त्यांच्या कर्तृत्वाला कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारत सरकारने 1994 साली त्यांना भारताचा सर्वोच्च 'भारतरत्न'  हा पुरस्कार प्रदान केला.

   आयुष्यामध्ये शाकाहारी आणि अविवाहित असणऱ्या या महामानवाने देशातील सर्व तरुणांसमोर एक आदर्श विचार मांडण्याचे कार्य केले.देशभरातून कार्यक्रम ,व्याख्यानाच्या माध्यमातून फिरत असताना ,उपदेश करताना सर नेहमी सांगत ," देशाची पिढी युवा शक्तीच्या कर्तृत्वातून घडत असते.तुमचे हात देशाच्या विकासासाठी आणि विकसित राष्ट्र बनवण्याच्या कमी लावा.प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पूर्ण करावी .

   अशी माणसे जेव्हा देशाच्या मातीत निर्माण होतात, तेव्हाच पाय जमिनीवरती ठेऊन आकाशाला गवसणी घालणाऱ्या पिढ्या निर्माण होत असतात,तेव्हाच देशाचा विकास होत असतो.

       आपल्याला देशाचा विकास करायचा असेल व देशाला महासत्ता बनवायचे असेल तर आपण कृतीशील विचारांची जोड दिली पाहिजे.हेच विचार कलाम सरांनी माणसांच्या मनावरती बिंबवण्याचे काम केले.कलाम सरांचे हे काम पाहून देशाचे अकरावे राष्ट्रपती म्हणून 2002 ते 2007 या कालखंडात त्यांची निवड झाली.

               देशातल्या लोकांना स्वप्ने दाखवणारा ,स्वप्नपूर्तीसाठी विचार रुजवणारा एक ध्येयवादी व्यक्ती म्हणून कलामसरांचा  उल्लेख केला जातो.देशाच्या विकासासाठी  शेतीबरोबर तंत्रज्ञान ,मातीबरोबर माणुसकी ,शिक्षणाबरोबर सहकाराच्या प्रगतीला गवसणी घालणारी पिढी जेव्हा निर्माण होईल तेव्हाच भारत महासत्ता बनेल .

  सामान्य कुटुंबातील तरुण ,संशोधक ,शास्त्रज्ञ ते देशाचे राष्ट्रपती.पिढी घडवणारा ,घडविण्याचे संस्कार देणारे किमयागार म्हणजेच ए.पी.जे.अब्दुल कलाम होय !



संबंधित पोस्ट्स -

ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे 40 प्रेरणादायी विचार .

अब्दुल कलाम यांचे जीवनकार्य .

वाचन प्रेरणा दिन भाषण .

'वाचाल तर वाचाल' निबंध .


वाचनाचे महत्व Importance of Reading


                                                       




वाचनाचे महत्व Importance of Reading 


                                             रोज सकाळी वर्तमानपत्र घरात आले की,प्रथम आपणच वाचावे असे वाटते .जगाच्या कानाकोपऱ्यात काय चालले आहे हे जाणून घेण्याची फार उत्सुकता असते.आपल्याला वाचता आले नसते तर केवढ्या अघाध  ज्ञानाला आपण पारखे झालो असतो.वाचाल तर वाचाल हे डॉ.आंबेडकरांचे सुवचन किती सार्थ आहे .पण याचा नेमका अर्थ फक्त योग्य वाचन करणाऱ्यालाच उमगू शकतो.

                       फार पूर्वी एक पुस्तक विकत घेण्यासाठी जमिनीचा मोठा तुकडा द्यावा लागत असे. आज मात्र परिस्थिती पूर्ण बदललेली आहे.अगदी १५ ते २० रुपयानांही एखादे चांगले पुस्तक मिळते.चांगल्या पुस्तकाच्या वाचनातून मनावर चांगले संस्कार होत जातात,अनेक विषयांवर चांगले मार्गदर्शन मिळते.पण वाचनाची आवड आज कमी होताना दिसत आहे.लोकांची व्यस्त दिनचर्या ,24 तास प्रसारित होणारी करमणूक व आधुनिक सुख-सुविधा यांमुळे वाचनाची गोडी कमी झाली आहे.

                            ग्रंथांना गुरूंचे स्थान देण्यात आले असून आपल्याकडे सर्व ज्ञान राखून न ठेवता ते वाचकाला देतात.जगाच्या विविध भागांतील संशोधकांची चरित्रे आपण वाचली तर आपल्या लक्षात येईल की ही माणसे जाती ,धर्म ,देश ,भाषा ,चालीरीती या सर्व बाबतींत पूर्णपणे भिन्न होती.पण त्यांचा वाचनाचा व्यासंग हे एक वैशिष्ट्य समान होते.वाचनामुळे माणसाचे जीवन बदलून त्याला एक नवीन दिशा मिळू शकते.

                     तसेच वाचनानंतर मनन -चिंतन करून त्या ज्ञानाचे प्रत्यक्षात आचरण करणारी माणसे संपूर्ण जगाचा आधारस्तंभ बनतात.उत्तम व्यावसायिक ज्याला बनायचे असते त्यांच्यासाठी त्या विषयातले अथांग ज्ञान देऊ करणारी साप्ताहिके अल्प किंमतीत बाजारात उपलब्ध असतात.अनेक लोक नको तिथे गरज नसतानाही वायफळ पैसे घालवतील पण २५ रुपयांचे एखादे चांगले पुस्तक विकत घेणार नाहीत .काही पुस्तके ही क्षणांची सोबती तर असतात तर काही आयुष्यभराची .

              वाचनाच्या छंदामुळे माणसाचे व्यक्तिमत्वही संपन्न होते.ज्या वक्त्यांचे वाचन भरपूर असते त्यांचे भाषण श्रवणीय व माननीय ठरते.कथा,कादंबऱ्या,नाटके,काव्य यांच्या वाचनाने मनोरंजन तर होतेच ,शिवाय मनाला  प्रसन्नता लाभते .शेक्सपिअरची नाटके आजही जगभर मोठ्या आवडीने वाचली जातात.निवेदक

,लेखक,मुलाखतकार ,वक्ते , अभ्यासक तसेच विचारवंत आणि इतर अनेकांना जर वाचनाची साथ असेल  तर त्यांच्या व्यक्तिमत्वात प्रभावीपणा व माधुर्य दिसून येते.

               वाचनाने माणूस चिंतनशील बनतो.आजकाल टेलिव्हिजनवरील मनोरंजन कार्यक्रम,मालिका,चित्रपट इ.चा प्रसार झाल्यामुळे माणसांची वाचनाची सवय खूपच कमी झाली आहे.दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम माणूस एकामागोमाग पाहतच जातो आणि वाचन पूर्णपणे विसरून जातो.याउलट एखादे चांगले पुस्तक वाचले तर ते आपल्याला विचारप्रवृत्त करते.आणि आपण योग्य पुस्तकाच्या वाचनाची गोडी लावली तर काही दिवसांतच तुमच्या आयुष्याला एक नवे वळण लागेल.म्हणूनच म्हणतो ....

वाचाल तर नक्की घडाल. 

Thursday, October 6, 2022

डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार A.P.J.ABDUL KALAM INSPIRATIONAL QUOTES

 

      


डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार 

भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम भारताचे लोकप्रिय राष्ट्रपती आणि भारताचे मिसाईल मॅन यांनी भारतातील तरुणांना नेहमीच प्रेरित केले आहे. त्यांनी आपल्याला स्वप्नं बघायला आणि पूर्ण करायला शिकवले.या व्हिडीओमध्ये आपण आपल्या मिसाईल मॅनचे 40 प्रेरणादायी विचार पाहूया. 

 स्वप्नं ती नसतात जी तुम्ही झोपेत बघता .

स्वप्नं तर ती असतात जी तुम्हाला झोप लागू देत नाहीत.


वाट बघणाऱ्यांना तेवढंच मिळते , जेवढं प्रयत्न करणारे सोडून देतात.

ज्या दिवशी तुमची सिग्नेचर ऑटोग्राफमध्ये बदलेल त्या दिवशी समजून जा की तुम्ही यशस्वी झालात.

स्वप्नं खरं होण्याआधी तुम्हाला स्वप्नं बघावी लागतील.

 

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल, तर आधी सूर्यासारखे तपावे लागेल.

तुम्ही तुमचे भविष्य बदलू शकत नाही ;परंतु तुम्ही तुमच्या सवयी नक्कीच बदलू शकता.आणि तुमच्या सवयीच तुमचे उद्याचे भविष्य बदलेल.

सवयी बदला आणि भविष्य बदलेल.




प्रेम करण्यासाठी तर संपूर्ण आयुष्य कमी पडतं.

काय माहित लोक राग करण्यासाठी वेळ कोठून काढतात?

जर तुम्हाला मातीत तुमच्या पाऊलखुणा उमटवायच्या असतील तर एकच उपाय आहे; कधीच पाऊल मागे घेऊ नका.

           

प्रयत्न न करता कधीच यश प्राप्त होत नाही आणि खऱ्या मनाने  केलेले प्रयत्न कधीच अयशस्वी होत नाही.



आपण एका अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता रंगावरून पाहिली जाते,शिक्षण मार्क्सवरून पाहिले जाते ,आदर इज्जत व पैसा पाहून दिली जाते.


आपण एका अशा समाजामध्ये राहतो जिथे सुंदरता रंगावरून पाहिली जाते,शिक्षण मार्क्सवरून पाहिले जाते ,आदर इज्जत व पैसा पाहून दिली जाते.


एखाद्याला हसणे खूप सोपे आहे .

परंतु  एखाद्याला जिंकणे खूप अवघड आहे.


काळ्या रंगाला अशुभ मानले जाते परंतु शाळेतील काळ्या  रंगाचा फळाच विध्यार्थ्यांचे आयुष्य,

त्यांचे भविष्य उज्ज्वल बनवतो .


यशस्वी लोकांचे चरित्र वाचू नका . त्यातून तुम्हाला फक्त संदेश मिळेल .अपयशी लोकांचे चरित्र वाचा - त्यातून तुम्हाला यशस्वी होण्याचे मार्ग मिळतील.

जोपर्यंत चांगले शिक्षण घेणे म्हणजे चांगली नोकरी लागणे ही संकल्पना पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या डोक्यातून निघत नाही ;तोपर्यंत समाजात नोकरच जन्माला येतील;मालक नाही .

 

आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या 

 तुम्हाला उध्वस्त करायला येत नसतात ,त्या  तर तुम्हाला तुमच्या मधील क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात.म्हणून कठीण परिस्थितीला देखील कळू द्या की तुम्ही देखील खूप कठीण आहात.


मी Handsome व्यक्ती नाही आहे.पण मी माझे Hand गरजूंना मदत म्हणून देऊ शकतो.सुंदरता ही मनात असते तोंडावर नाही .


कधी कधी वर्ग बुडवून मित्रांसोबत वेळ घालवणे चांगले असते .कारण आज मी मागे वळून बघतो 

तर माझे मार्क्स मला हसवत नाहीत .मित्रांसोबतच्या घालवलेल्या आठवणी मला हसवतात.


दोन परिस्थितीमध्ये नेहमी शांत राहा .

एक - जेव्हा तुम्हाला वाटेल की तुमच्या शब्दावरून तुमच्या भावना समजू शकणार नाहीत .

दोन - जेव्हा समोरचा व्यक्ती तुम्हाला तुम्ही शब्दही न बोलता समजून घेईल .


जुने मित्र सोन्यासारखे असतात .नवीन मित्र हिऱ्यासारखे असतात.जेव्हा तुम्हाला हिऱ्यासारखे मित्र भेटतील ,तेव्हा सोन्यासारख्या मित्रांना विसरू नका.कारण सोन्याची अंगठीच हिऱ्यांना पकडून 

ठेऊ शकते.


प्रेम आंधळे असते ,हे खरे आहे. कारण माझ्या आईने मला न बघताच प्रेम करणे सुरु केले होते.


पहिल्या विजयानंतर थांबू नका.कारण दुसऱ्यांदा अपयशी ठरलात तर तुमचं पहिलं यश नशिबाने मिळाले होते, हे म्हणण्यासाठी अनेकजण तयार असतात.


महान स्वप्नं पाहणाऱ्यांची महान स्वप्ने नेहमीच पूर्ण होतात.       


माणसाला समस्या ,अपयशाची आवश्यकता असते.कारण नंतर यशाचा आनंद घेण्यासाठी ते गरजेचे असते.


छोटे ध्येय ठेवणे अपराध आहे.तुमचं ध्येय नेहमी मोठे असले पाहिजे.


तोपर्यंत लढणे थांबवू नका,जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठरवलेल्या ध्येयापर्यंत पोहचत नाही.


जीवनात एकच ध्येय ठेवा.सतत ज्ञानप्राप्त करत राहा,कठोर मेहनत करा. महान जीवन मिळण्यासाठी नेहमी कार्यरत राहा.


जर आपण स्वतंत्र नसणार तर कोणीच आपला आदर करणार नाही .


आकाशाकडे बघा.आपण एकटे नाही आहोत.संपूर्ण ब्रम्हांड आपल्यासाठी अनुकूल आहे.


जे स्वप्नं  बघतात ,मेहनत करतात.त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ देण्यासाठी ब्रम्हांड नेहमी तयार असते.


तरुणांना माझा संदेश आहे की , वेगळ्या पद्धतीने विचार करा.काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करा.स्वतःचा रस्ता स्वतः बनवा,आणि जे अशक्य आहे ते मिळवा.


तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्ही एकाग्र होऊन ध्येयावर लक्ष द्यायला पाहिजे.


मला पूर्ण विश्वास आहे.ज्याने अपयशाची कडू गोळी चाखलेली नसेल ,तो यशासाठी आवश्यक तेवढी महात्वाकांक्षा ठेऊ शकत नाही.


सर्वांकडे एकसमान Talent नसतो.परंतु Talent निर्माण करण्याच्या संधी सर्वांकडे नक्कीच असतात.


सतत अपयश येत असल्यास निराश होऊ नका,कारण कधी कधी अनेक चाव्यातील शेवटची चावी कुलूप उघडू शकते.


सक्रीय व्हा , जबाबदारी घ्या!त्या गोष्टीवर काम करा,ज्यावर तुमचा विश्वास आहे.जर तुम्ही हे करत नसाल ,तर तुम्ही तुमचे भाग्य दुसऱ्यांच्या हाती देत आहात .


अपयश नावाच्या रोगासाठी आत्मविश्वास आणि परिश्रम हे जगातील सर्वात गुणकारी औषध आहे.


देशातील सर्वोत्तम मेंदू हा वर्गातील शेवटच्या बेंचवर सापडतो.


यशाचे रहस्य काय ? योग्य निर्णय घेणे .

योग्य निर्णय कसे घ्यावे ? अनुभवाने

आणि अनुभव कसे घ्यावे ? चुकीचे निर्णय घेऊन .


इंग्रजी शब्द ‘END’ चा अर्थ ‘शेवट’ असा नसून ..

Effort Never Dies” म्हणजेच

‘प्रयत्न कधीच वाया जात नाहीत’ असा होतो .


Fail चा अर्थ अपयश असा होत नाही.तर

First Attempt in  Learning’

‘शिकण्यासाठी पहिला प्रयत्न’ असा होतो.


 


Wednesday, September 28, 2022

शहीद भगतसिंग Shahid Bhagatsingh



                                     




                               



अध्यक्ष महाशय, गुरुजनवर्ग उपस्थित प्रेक्षक आणि मित्रानो, प्रथम मायभूमीला परकीय सत्तेच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या, या भूमीवर रक्ताचा अभिषेक करून तिला पारतंत्र्यातून मुक्त करणाऱ्या त्या शूरवीर क्रांतिकारकांना प्रथम वंदन करतो. आज मी अशाच एका क्रांतिकारकाविषयी बोलणार आहे. 'भारतीय क्रांतिकारकांचे मेरूमणी' अशा शब्दात ज्यांचा गौरव केला जातो, त्या थोर क्रांतिकारकाचे नाव आहे पंजाबचे क्रांतिसिंह शहीद भगतसिंग.

   

१९२८ मध्ये भारताला काही सुधार देण्याच्या उद्देशाने ब्रिटिश सरकारने सायमन कमिशन भारतात पाठवले; पण या कमिशनचे सातही सदस्य इंग्रज होते. इंग्रजांना भारतीय जनतेच्या समस्या काय माहीत? भारतीय नेत्यांपैकी एकालाही त्यात न घेतल्याबद्दल सायमन कमिशनला भारतातून विरोध झाला, सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यासाठी सर्व नेते सज्ज झाले.


लाहोर शहरात याविरुद्ध निदर्शने करण्यात आली. या मोचार्च नेतृत्त्व होते लाला लजपतराय या वयोवृद्ध नेत्याकडे. सर्वांचे आवडते नेते मोठ्या हिमतीने इंग्रजांचा निषेध करत होते; पण उर्मट इंग्रजांनी हे आंदोलन चिरडून टाकत लाठीहल्ला सुरू केला. यात लालाजी जखमी झाले. पुढे त्यातच त्यांचा अंत झाला.


क्रांतिकारकांची माथी भडकली. इंग्रजाविरुद्ध क्रांतिज्योत पुन्हा भडकली. 

संबंध भारत देशात हाहाकार माजला होता. इंग्रजांच्या मनमानी वागण्याला भारतीय जनता त्रासली होती. अन्याय, अत्याचाराने जनता भयभीत झाली होती. इंग्रजांच्या जुलूम शाहीचा आता अहिंसेच्या नव्हे, तर सशस्त्र क्रांतीच्या मार्गाने नायनाट करायला हवा, असा ठाम निर्णय घेण्याची वेळ आली होती. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असतानाच भगतसिंगांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने 'नौजवान भारत सभा' स्थापन केली.अनेक मित्रांना स्वातंत्र्यांचे महत्त्व पटवून देत या नौजवान संघटनेत सामील करून घेतले. त्यांच्या संघटनेच्या 'इन्किलाब जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' या घोषणेने आसंमत हादरून जायचा. क्रांतीची ठिणगी पडू लागली होती. भारतीय मने स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटली. जीवाचे रान करून प्राण तळहातावर घेऊन जुलमी इंग्रजांविरुद्ध उघडपणे सशस्त्र क्रांती करण्यास तयार झाली होती.


   लाला लजपतराय यांच्या खुनाचा बदला घ्यायचा, अशा निश्चय भगतसिंगांनी केला. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, राजगुरू यांनी एक योजना आखून ज्या इंग्रज अधिकाऱ्याने लाठीहल्ला करवून लालाजींचा खून केला, त्या इंग्रज अधिकाऱ्याचा शेवट करायचा निर्णय घेतला आणि ठरलेल्या योजनेप्रमाणे १७ डिसेंबर, १९२८ रोजी पिस्तुलाचा ठो ठो आवाज झाला आणि मोटारीतून चाललेल्या सँडर्स या इंग्रजी अधिकाऱ्याचा नायनाट झाला. ब्रिटिश सरकार हादरले. पळून गेलेल्या मारेकऱ्यांना म्हणजेच भगतसिंग, राजगुरू, चंद्रशेखर यांचा शोध सुरू झाला. क्रांतिकारक वेषांतर करून राहू लागले.


८ एप्रिल, १९२९ रोजी दिल्लीच्या पार्लमेंटमध्ये 'पब्लिक 'सेफ्टी' बिलावर चर्चा चालू होती. ही बिले म्हणजे कामगारवर्ग आणि सामान्य जनता यांच्यावर मर्यादा घालणारी होती. क्रांतिकारकांना हे पटले नाही. भगतसिंग यांनी या गोष्टीचा निषेध करायचा निर्णय घेतला; पण तो क्रांतीच्या मार्गाने.


भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी सभागृहात प्रवेश करून बॉम्बस्फोट घडवून आणला व स्वतः पोलिसांच्या स्वाधीन होत आपल्या करारी आवाजात त्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले, की बहिऱ्यांना ऐकू यावे, यासाठी आम्ही आवाजाचा धमाका केला. सरकारने हिंदी जनतेवर चालवलेली जुलूमजबरदस्ती आणि निरपराध लोकांची हत्या व लाला लजपतराय यांची हत्या या साऱ्या गोष्टींचा आम्ही निषेध करत आहोत, तोही आमच्या मार्गाने! " माणसे मारणे हा आमचा उद्देश नाही; परंतु आमच्या मातृभूमीसाठी हे आम्हाला करणे भाग पडले." असे उद्गार काढताच 'इन्किलाब जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' या घोषणांनी सभागृह दणाणून गेले.


भगतसिंग, बटुकेश्वर दत्त, सुखदेव, राजगुरू या सर्व क्रांतिकारकांनी तुरुंगात डांबून इंग्रजांनी त्यांच्यावर गुप्तपणे खटला सुरू केला. इकडे भारतीय जनतेत हे क्रांतिकारक मानाचे स्थान म्हणून भारतीयांच्या मनात बसले होते.


क्रांतिकारकांची वाढती लोकप्रियता पाहून इंग्रजांनी सर्व नियम धाब्यावर बसवून भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावली.


२३ मार्च, १९३१ रोजी या तिघांनाही फाशी देण्यात आली. मातृभूमीला अखेरचा सलाम करून तिचा निरोप घेतला. 'इन्किलाब जिंदाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद' असे म्हणत त्यांनी मृत्यूला मिठी मारली.


हसत हसत मृत्यूला सामोऱ्या जाणाऱ्या या थोर क्रांतिकारकांना माझा सलाम ! मित्रहो, एवढं बोलून माझे भाषण थांबवतो.


जय हिंद, जय भारत ! इन्किलाब जिंदाबाद !

Tuesday, September 27, 2022

पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव प्रश्नपत्रिका 09 5th Std Scholarship Exam Practice Paper 09

 





इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा सराव संच मालिका 
Test No.9 
सोडवण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.









महात्मा गांधी

                           



                             आज गांधीजींच्या जयंतीनिमित्ताने जो कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, त्यासाठी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे अध्यक्ष व व्यासपिठावर उपस्थित सर्व मान्यवर, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना ज्ञानामृत पाजणारे गुरुजनवर्ग आणि माझ्या शालेय सवंगड्यांनो, आज मी गांधीजींच्या जीवनावर थोडे बोलणार आहे, ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्यावे, अशी माझी नम्र विनंती आहे.

    'महात्मा गांधी' म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक कर्तबगार आणि थोर नेते. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. २  ऑक्टोबर १८६९  हा त्यांचा जन्मदिवस. राजकोट संस्थानचे दिवाण असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांना चांगले शिक्षण दिले.

          मित्रहो , त्यावेळच्या शिक्षणात मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गांधीजींनी इंग्लंड गाठले.ते बॅरीस्टर झाले आणि वकिली करू लागले.परदेशात वकिली करीत असतानाच काळे-गोरे हा जनमाणसातला भेदभाव त्यांना दिसून आला.रेल्वेच्या प्रवासात त्यांना भयानक गोष्टीला सामोरे जावे लागले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्या लोकांनी बसायचे ,हे गोरे इंग्रज ठरवत असत.गोरे इंग्रज वर्णाने काळे असलेल्या लोकांवर अन्याय ,अत्याचार करत असत ,त्यांना गुलामासारखे वागवत असत.याच अनुभवाने प्रेरित होऊन महात्मा गांधीजींनी इंग्रजांविरुद्ध लढण्याचा दृढनिश्चय केला; पण त्यांनी इंग्रज राजवटीशी लढाई करण्यासाठी जो मार्ग निवडला तो म्हणजे अहिंसेचा .

        जनतेच्या हालअपेष्टा त्यांना पहावल्या नाहीत.भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्यांनी एक विचारांची अखंड चळवळ उभी केली.स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेल्या नेत्यांना आपल्यात सामील करत त्यांनी इंग्रजाविरुद्धची फळी बळकट केली.भारतातील गरिबी ,उच्च नीच भेदभाव ,अंधश्रद्धा नष्ट व्हावी म्हणून त्यांनी योग्य ती पावले उचलली .अन्न ,वस्त्र आणि निवारा या मुलभूत गरजाही काही भारतीय लोकांना पुरेशा नव्हत्या .मित्रहो ,जनतेचे हे हाल गांधीजींना पहावले नाहीत.त्यांचे हळवे  हृदय  देशप्रेमाने आणि देशबांधवांच्या प्रेमाने गहिवरून आले.त्यांनी जनतेला अन्न,वस्त्र ,निवारा पुरेसा मिळावा म्हणून कार्य करण्याचे ठरवत स्वतःच्या भरजरी कपड्यांचा त्याग केला आणि सुटाबुटातील वकिली पेशातील गांधीजीनी फक्त पंचा नेसून अंगावर उपरणे घेत वावरू लागले.जणू त्यांनी शपथ घेतली होती .... मायभूमीला स्वातंत्र्याचे वस्त्र परिधान करण्याचे!

           एवढेच करून ते थांबले नाहीत.त्यांनी इंग्रजांविरुद्ध अनेक आंदोलने छेडली ,अनेक सत्याग्रह केले.इंग्रजांच्या जुलमी कारभाराचा त्यांनी निषेध केला.इंग्रजांच्या जाचक धोरणांना विरोध केला.त्यांच्या साध्या राहणीमानाला आणि  उच्च विचारांना भारून जनता त्यांना 'महात्मा', 'राष्ट्रपिता' 'बापूजी' म्हणू लागली.

त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेली जनता रस्त्यावर उतरली.ते भारताला स्वातंत्र्य मिळवून  देण्याच्या ,स्वातंत्र्यासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी असलेल्या जनसमुदायाच्या साथीने गांधीजीनी जुलमी इंग्रजांना हैराण केले.

    'भारत छोडो', 'सायमन गो बॅक'  अशी आंदोलने छेडली .वेळप्रसंगी गोऱ्यांचा लाठीमारही त्यांनी सहन केला.सर्वधर्मसमभाव हा जनतेमध्ये जागवत भारतीय जनता एकसंघ बनवण्यासाठी मोलाचे कार्य केले.

              १५ ऑगस्ट १९४७ साली भारत स्वतंत्र झाला.अनेक नेत्यांनी आपआपल्या मार्गांनी देशासाठी योगदान दिले.त्यात गांधीजींचा सिंहाचा वाटा होता,असे म्हटले तर चूक ठरणार नाही.शस्त्र न उचलताही लोकशाहीच्या मार्गाने सरकारला धारेवर धरता येते , हेच त्यांनी जगाला दाखवून दिले.इंग्रज देश सोडून निघून गेले.देश स्वतंत्र झाला; परंतु देशाची फाळणी झाली.एकाच देशाचे दोन देश निर्माण झाले.काहींना ही गोष्ट खटकली आणि याच कारणामुळे ३० जानेवारी ,१९४८ रोजी महात्मा गांधीजींची हत्या झाली.ते काळाच्या पडद्याआड गेले.खरं 'महात्मा' म्हणजे महान आत्मा होते ते ! या महान नेत्यास त्रिवार अभिवादन ! 

जय हिंद, जय भारत !