Showing posts with label marathi bhashan. Show all posts
Showing posts with label marathi bhashan. Show all posts

Thursday, December 22, 2022

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्याविषयी भाषण





अध्यक्ष महाशय,

मला भाषण करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या मॅडम......उपस्थित प्रेक्षक,गुरुजनवर्ग आणि माझ्या बाल मित्रांनो,

 मी आज छत्रपती शिवरायांच्या मातोश्री आऊसाहेब जिजाबाई यांच्या विषयी चार शब्द बोलणार आहे.

 इसवीसन 1600  साल आठवले की आपल्याला आठवतो तो छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास.पण शिवजन्मापूर्वीचा इतिहास त्याहूनही भयानक होता. तब्बल तीनशे ते साडेतीनशे वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात होता.खरंतर आज आपण खूप सुरक्षित आणि आनंदी जीवन जगत आहे.

 जरा विचार करून बघा. समजा वीज नसती, रस्ते नसते,फोन, मोटारी नसत्या,वर्तमानपत्र नसती, नुसती कल्पना केली तरी आपल्याला ती सहन होणार नाही. पण त्याकाळी हे काही नसताना माणसं जगत होती.

   सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आणि सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत ती राबत होती, झगडत होती,अन्याय आणि अत्याचाराशी परकीय शत्रूंनी आक्रमण केलेल्या भयानकाळी राती इथे थैमान घालत होत्या. अशातच एक मायमाऊली वाट बघत होती या अंधाराला भेदून सर्वदूर महाराष्ट्रात प्रकाशाचे किरण पसरून आनंदाची वीज चमकणाऱ्या तेजस्वी सूर्याची. शत्रूच्या हुकूमशाहीने आणि अत्याचाराने त्रस्त झालेल्या रयतेला सुखी समृद्ध करण्यासाठी. एक भोळी आस लावून ती माय एका प्रखर तेजोमय किरणासाठी आतुरली होती.ती कणखर, निर्भय आणि आशावादी माय म्हणजेच मासाहेब जिजाऊ .

   19 फेब्रुवारी 1630 मध्ये या माय माऊलीच्या पोटी एक तेजस्वी, तेजाळता सूर्य जन्माला आला. त्याच्या तेजाने महाराष्ट्र उजळून निघाला.शिवबाच्या चरणाशी नतमस्तक होण्यासाठी. शिवबाचा चरण स्पर्श घेण्यासाठी वसुंधरा आसुसली होती. त्यांच्या हरहर महादेव गर्जनेने सह्याद्रीचा ऊर अभिमानाने भरून आला होता.

  रयतेच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा,परकीयांच्या अन्याय, अत्याचाराला महाराष्ट्रातून जमीनदोस्त करणारा ध्येयवादी महापराक्रमी राजा आई जिजाऊंच्या पोटी जन्माला आला. पण शिवराय असे आपोआपच घडले नाहीत. त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या होत्या जिजाऊ साहेब. त्यांची तपस्या त्यांनी झेललेल्या हालपिष्ठा पती महिनो महिने लढाईवर असताना त्यांनी बाल शिवबाचा  सांभाळ केला.

 अहो नुसता सांभाळच केला नाही तर त्यांच्या अनेक गोष्टी पारखत असत. अनेक पराक्रमी महापुरुषांचे चरित्र सांगत त्यांच्या अंगात बळ निर्माण केलं.मन घट्ट बनवलं. शरीर दणकट निगरगट्ट बनवलं.आपली रयत अंधारात आहे.तिच्यावर होणारा अत्याचार, निरपराध लोकांचे जाणारे बळी या सर्व गोष्टींची जिजाऊंनी शिवबाला जाणीव करून दिली आणि रयतेच्या कल्याणासाठी प्राणपणाने झुंजायला शिकवलं. म्हणूनच आई जिजाऊ थोर आहेत.आजच्या भाषेत सांगायचं तर ग्रेट आहेत.

 आजच्या माता बघितल्या तर आपल्याला कळून येईल, मुलाला थोडं खरचटलं तरी त्याला खूप खूप जपतात. पण त्या जिजाऊने राजपुत्र म्हणून त्याला राजवाड्यात जपून ठेवला नाही. तर सामान्य जनतेत मिसळायला शिकवलं.त्यांची सुखदुःख वाटून घ्यायला शिकवलं.म्हणून छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे झाले.खरंच धन्य त्या जिजाऊ साहेब!एवढे बोलून मी थांबतो.


 जय हिंद!जय महाराष्ट्र!

Sunday, October 23, 2022

पंडित जवाहरलाल नेहरू Pandit Jawaharlal Nehru



पंडित जवाहरलाल नेहरू

 Pandit Jawaharlal Nehru 

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ,मुलांचे आवडते चाचा म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा आज जन्मदिवस.त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि बालदिनाच्या निमित्ताने कार्यक्रमास उपस्थित असलेले अध्यक्ष महाशय माननीय ....... सर प्रमुख पाहुणे ..... सर आमचे सर्व गुरुजन वर्ग ,समोर उपस्थित असलेले श्रोते आणि माझ्या बालमित्रांनो ......

     ना सुकला गुलाब 

कधीच त्यांच्या रसिकतेचा ,

फुलासारखे जपत मुलांना 

घेतला ध्यास त्यांनी विकासाचा ........

झोकून दिला देह देशासाठी ..

विचार मनात फक्त स्वातंत्र्याचा....

मित्रहो ,मी कुणाबद्दल बोलतोय हे तुमच्या लक्षात आलेच असेल .अहो इंग्रजांच्या वाईट व जाचक हुकुमशाहीचा बिमोड करण्यासाठी अनेकांना लढा द्यावा लागला.असेच एक महान ,थोर व्यक्तिमत्व म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू.गांधीजींसोबत अहिंसेच्या मार्गाने इंग्रज सरकारला धारेवर धरणारे हे थोर नेते.पंडित जवाहरलाल नेहरू म्हटलं ,की प्रथम आठवतात ती गुलाबाची फुलं आणि गुलाबाच्या फुलांप्रमाणे गोंडस आणि निरागस मुलं!नेहरुंना गुलाबाची फुलं आणि फुलांसारखी निरागस मुलं फार आवडत असत.देशाचे उज्ज्वल भविष्य म्हणून मुलांकडे ते मोठ्या आशेने पाहत असत.देशाचे भविष्य ज्यांच्या हाती आहे,त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा ,असा त्यांचा ध्यास असायचा.14 नोव्हेंबर 1889 रोजी जन्मलेल्या पंडित नेहरूंनी आपले संपूर्ण आयुष्य देश स्वतंत्र करण्यासाठी आणि स्वतंत्र झालेल्या देशाला प्रगत बनवण्यासाठी खर्ची घातले.

           देश स्वतंत्र करण्यासाठी सत्याग्रह ,अहिंसा ,स्वदेशी,असहकार या मार्गांचा उपयोग करून त्यांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध लढा दिला.'सायमन गो बॅक'  म्हणत कॉंग्रेसने सायमन कमिशनला विरोध करत निदर्शने केली.यात पंडित नेहरूही सामील होते.या आंदोलनात पोलिसांनी केलेल्या लाठीमारात पंडितजी जखमी झाले.1942 मधील 'चलेजाव आंदोलनात' त्यांनी इंग्रजांना पळताभुई थोडी केली.स्वातंत्र्याच्या वेडाने झपाटलेली भारतीय जनता पाहून इंग्रजांचे धाबे दणाणले .या आंदोलनातील अनेकांना त्यात्यानी तुरुंगात टाकले.पंडित नेहरू तुरुंगात अडकले .देशहिताची कामे करणे अवघड झाले;परंतु ते डगमगले नाहीत.आमचे काहीही होवो;पण तुम्ही देशाच्या स्वातंत्र्याचे कार्य सुरु ठेवा,असा सल्ला त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिला.तुरुंगात असताना स्वस्थ न बसता त्यांनी लेखन केले.भारताच्या इतिहासावरील एक मोठा 'शोधग्रंथ' त्यांनी लिहिला.या ग्रंथाचे नाव होते 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया'.

नेहरू तुरुंगातून सुटले.स्वातंत्र्याचा लढा अधिक तीव्र झाला.स्वातंत्र्याचे महत्व जनतेला पटले होते.या गोऱ्या इंग्रजांना येथून हाकलून द्यायचेच , या एकमेव निर्धाराने जनता पेटून उठली होती.पंडित नेहरूंनी भारताच्या स्वातंत्र्याचा मांडलेला ठराव मंजूर करून घेण्यात आला .भारतीय जनतेचा रोष पाहता इंग्रजांना आता माघार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही.

15 ऑगस्ट 19 47 साली भारत स्वतंत्र झाला.पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान झाले.स्वतंत्र भारताच्या अनेक समस्या म्हणजेच अज्ञान,बेकारी ,दुष्काळ अशा अनेक प्रश्नांची त्यांनी योग्यप्रकारे हाताळणी करत देशाची वैज्ञानिक प्रगती केली आणि शेतीचा विकास घडवून आणला.

त्यांच्या उदंड कार्याची दाखल घेत 1952 साली त्यांना 'भारतरत्न' या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

मित्रांनो या थोर नेत्याने आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी वाहिले.27 मे 1964 रोजी ते आपल्यातून निघून गेले.खरे तर आपण आपल्या जीवनात देशहिताचे कार्य करणे ,देशबांधवांच्या हितासाठी कार्यरत राहणे आणि देशाला प्रगतशील बनविण्यात हातभार लावणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल ! 

जय हिंद ,जय भारत ! 







Related Posts

विविध विषयांवरील मराठी भाषणे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.


तरुणाईचे प्रेरणास्थान : ए.पी.जे.अब्दुल कलाम


वाचनप्रेरणा दिन  : वाचनाचे महत्व 

 

वाचनप्रेरणा दिन  : वाचनाचे महत्व  Importance of Reading


डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार


डॉक्टर ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा जीवनपरिचय 

 

शहीद भगतसिंग माहितीपट


महात्मा गांधी मराठी भाषण


लाल बहादूरशास्त्री भाषण


महात्मा गांधी मराठी भाषण


भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : इंदिरा गांधी


डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जीवनपरिचय १


डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन जीवनपरिचय २

14 नोव्हेंबर -बालदिन विशेष माहितीपट - पंडित जवाहरलाल नेहरू यांचे जीवनकार्य 


शिक्षकदिन मराठी भाषण


कर्मवीर भाऊराव पाटील मराठी भाषण


सुप्रसिद्ध व्यक्ती व त्यांचे उद्गार


डॉ.एन.डी.पाटील परिचय


सावित्रीबाई फुले मराठी भाषण


महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी भाषण


डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार


लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज


छत्रपती शिवाजी महाराज


मराठी राजभाषा दिवस